दे आसरा फाउंडेशन सुरु होऊन आता ५ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. ह्या काळात अक्षरशः हजारों व्यक्तींची प्रत्यक्ष भेट झाली. अशा व्यक्ती की ज्यांना स्वतः व्यवसाय करण्याची ईच्छा होती अणि नेमके काय करावे हे नक्की करता येत नव्हते. मनात कोणता व्यवसाय करावा अन कोठे जागा निवडावी, ह्याबद्दल विचार केलेला असायचा पण मनात भीती असायची की सगळं आपल्याला जमेल ना ? समजा नाही जमले तर घरातले अन आजूबाजूचे आपल्याला काय म्हणतील ? घरातला महिलावर्ग आत्ताच आपल्याला विरोध करीत आहे. ह्या परिस्थितीतील व्यक्तींना मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते.
मार्गदर्शक असा की ज्याने ह्या इच्छुक उद्योजकाला समजून घेऊन त्याच्या विचारांना दिशा देण्याचे काम केले पाहिजे. विचारांमधील त्रुटी लक्षात घेऊन त्या दूर करण्याचे काम केले पाहिजे. उद्योगातील जोखिम लक्षात आणून देऊन ती कशी कमीतकमी होईल यासाठीचे उपाय सुचविले पाहिजेत. त्याचबरोबर एखाद्या अव्यवहार्य ( NOT Feasible) विचारांची जाणीव करुन द्यायला पाहिजे.
असा मार्गदर्शक कोठे मिळेल ? असा मार्गदर्शक जे सांगेल ते योग्य असेल का ? त्याच्या भरवशावर आपण पुढील वाटचाल करावी का ? सर्वसाधारणपणे आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण अशा काही व्यक्ती पहिलेल्या असतात की ज्या स्वतः चांगल्या माहितगार असतात, ज्यांना व्यावहारिक जगाचा भरपूर अनुभव असतो. आपल्याच शाळेतले / कॉलेजातील शिक्षक, नात्यातील काही व्यावसायिक / उद्योजक , आपल्या गावातील काही यशस्वी व्यापारी / उद्योजक, आपल्या मित्रांच्या नात्यातील काही व्यक्ती यापैकी कोणीतरी आपल्या डोळ्यासमोर येतील. त्यांच्याशी विविध प्रकारे संपर्क साधुन आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करू शकतो.
आपल्याला उद्योजकतेविषयी आणि आपल्या विचारातील उद्योगाविषयी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा न करता, त्याविषयी काही सुचना, वेगळा दृष्टिकोन मिळेल अशी अपेक्षा ठेवली पाहिजे. त्याचा उपयोग आपल्याला काही प्रमाणात नक्की होईल. संपूर्ण मार्गदर्शनासाठी अर्थातच आपल्याला देआसरा फाउंडेशनला ( फोन नं - 8669985599 ) संपर्क करावा लागेल. त्यांचे काम ह्या संचारबंदीच्या काळातही सुरु आहे. सोम-शुक्र. सकाळी १० ते संध्याकाळी ६ ह्या वेळेत. ह्या संबंधातिल काही उदाहरणे आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील.
१.
एका चष्म्याच्या उद्योजकाला आपले दुकान चालत नसल्याने दुसऱ्या परिसरात हलवावे लागले. ते चालले नाही कारण त्या परिसरात चष्म्याची अनेक दुकाने खुप आधीपासून सुरु होती अन परिसरातील रहिवाश्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध जोडले गेलेले होते. उद्योजकाला ह्या व्यवसायाविषयीची बाजू आणि अनुभव असूनही त्याला यश मिळाले नव्हते.
२.
एका अल्पउत्पन्न रहिवाश्यांच्या परिसरात एकाने अत्यंत उच्च दर्जाच्या किराणामालाचे दुकान सुरु केले. त्या दुकानातील माल हा एका उत्कृष्ठ दर्जाच्या ब्रँडचा होता आणि त्याच्या किमती खुप जास्त असत. साहजिकच त्या परिसरामध्ये ह्या दुकानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वर्षभरात ते दुकान बंद करावे लागले.
३.
एका महिलेने तिच्या शिवणकामाच्या कौशल्यावर स्त्रियांचे कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यात तिला चांगले यश मिळाले. तिचे दुकान हमरस्त्यापासून आतल्या बाजूला होते. काही वर्षांनी तिच्या शेजारचे दुकान उपलब्ध होते आहे असे पाहून तिने तेथे तयार कपड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी तिने बॅंकेकडून कर्ज घेऊन मालाचा पुरेसा साठा केला, दुकान हमरस्त्यापासून दूर असल्याने त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि ६ महिन्यात नवीन माल न आणल्याने माल खपेना. शेवटी सगळा साठा ठोक पद्धतीने ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना विकून उद्योगातुन बाहेर पडावे लागले.
वरील उदाहरणावरून लक्षात येईल की आपल्या उद्योजकीय प्रवासासाठी आपल्याला कशा पद्धतीने विचार करावा लागेल. उद्योगाच्या अनेक पैलूंचा विचार आपल्या योजनेमध्ये केला तर उद्योग यशस्वी होण्याची शक्यता जवळ जवळ १००% होईल.
----
लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.