Sunday, September 13, 2020

व्यवसायासाठी भांडवल - 2

आपण आता आपला व्यवसाय सुरु करण्यास सज्ज झालो आहोत आणि त्यासाठी भांडवल कोठून मिळेल याचा मागोवा घेत आहोत. आपली भांडवलाची गरज व्यवसायाच्या सुरुवातीला तरी कमीत कमी असावी यासाठी आपण व्यवसायाच्या गरजांचा विचार करून ठेवलेला आहे. जागा, यंत्रे इत्यादी गोष्टी भाड्याने मिळू शकतील का ? उधारीवर व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी मिळू शकतील का ? लागणारे मनुष्यबळ फक्त कामाच्या वेळेसाठी यायला तयार आहे का ? इत्यादी गोष्टींवर आपण माहिती घेऊन सुरुवातीला कमीत कमी किती भांडवल लागेल हे निश्चित केले आहे.


आता आपल्याला आपले स्वतःचे किती पैसे उपलब्ध होऊ शकतील याचा विचार करायचा आहे. स्वतःकडील, नातेवाईक / मित्र यांची मदत या सर्वांमधून आपण किती गुंतवणूक करू शकतो हे माहीत असणे आवश्यक आहे. कर्जाच्या बाबतीत विचार करताना एकूण भांडवलाच्या गरजेच्या 25% रक्कम स्वतः उभी करणे आवश्यक असते. मोठ्या गुंतवणुकीसाठी ही 15% पर्यंत कमी चालू शकते. ही रक्कम वेगवेगळ्या परिस्थितीत वेगळी असू शकते आणि ती 0% ते 25% अशी आढळते. काही विशिष्ट व्यवसायांसाठी सरकारी मदत मिळू शकते, त्यासाठी आपण जो व्यवसाय करणार आहोत त्या संबंधातील सरकारी खात्याकडे जाऊन विचारणा करता येईल.

छोट्या व्यवसायासाठी Crowd Funding ह्या पद्धतीने कर्ज देणाऱ्या संस्थांचा विचार करण्यास हरकत नाही. कर्ज देण्याचे काम या संस्था सामाजिक कार्य या भावनेने करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या व्याजाचा दर कमी असतो. वेगवेगळ्या पतपेढ्या कर्ज देऊ शकतात आणि त्यासाठी आपल्या भागातील पतपेढयांचा विचार करणे आवश्यक. सहकारी बँकाकडे विनंती अर्ज करणे हे बऱ्याचदा उपयोगी होते. कारण, तेथे निर्णय प्रक्रिया तुलनेने सोपी असते. मात्र व्याजाचा दर थोडा जास्त असू शकतो. भांडवलाची गरज जास्त असल्यास राष्ट्रीयीकृत बँकांकडे जायला हरकत नाही.

आपण नेमके कोणाकडे जावे हे अनेक गोष्टींवर ठरते. व्यवसायाचे स्वरूप ( भाजी / फळे विक्री / केशकर्तनालय /  चार चाकी दुरुस्तीचे गॅरेज / छोटा कारखाना ), व्यवसायाचे ठिकाण, भांडवलाची गरज - 50,000 / 2,00,000 / 10,00,000 / त्यापेक्षाही जास्त. एकूण भांडवलातील खेळते भांडवल किती आणि घर / जागा / यंत्रे यातील गुंतवणूक किती. कर्जासाठी तारण देता येईल का ? ते  कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे आहे का ? कर्जाच्या परतफेडीची हमी द्यायला कोण तयार आहे ?त्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे का ? अशा अनेक गोष्टी यात येतात. ही यादी मोठी वाटली तरी ती आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये बरीचशी तयार केलेली असते. 

एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणीही व्यक्ती अथवा संस्था अथवा बँका पैसे केव्हा देतील ? जेव्हा त्यांना कर्जाच्या परतफेडी विषयी शंका असणार नाही. व्यवसाय करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचे व्यवसायाबद्दलचे ज्ञान, अनुभव, व्यवसायाबाबतची आवड, व्यवसाय बाजारपेठेत चांगला चालण्याची शक्यता, व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी लागणारा खर्च भागवल्यावर उरणाऱ्या रकमेतून कर्जाच्या परतफेडीचा हप्ता भागू शकेल का ?व्यवसायात  वर्षभर नफा मिळू शकेल का ? तो  काही महिन्यात चांगला व इतर काळात मंदीत असेल का ? अशा व्यवसायात चांगल्या चालणाऱ्या काळात वर्षभराच्या गरजेच्या एवढा नफा मिळेल का अशा सार्‍या गोष्टींचा विचार कर्ज मंजूर करताना केला जातो. व्यक्तीचा CIBIL Score सुद्धा फार महत्त्वाचा असतो.  त्याने या पूर्वी घेतलेली कर्जे वेळेवर फेडली आहेत का, हे त्यावरून लक्षात येते.  

कर्जाच्या मंजुरीसाठीची कागदपत्रे, त्यासाठीची तयारी, व्यवसायाची योजना इ. माहितीसाठी आपण www.deasra.in वेबसाईटवर जावे.  देआसरा फाउंडेशन यासाठी आपल्याला मदत करू शकेल.  

---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. ©यशस्वी_उद्योजक

Thursday, August 20, 2020

व्यवसायासाठी भांडवल -1

 बहुतांशी इच्छुक व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी काय लागते असे विचारले की त्याचे उत्तर असते भांडवल. अशा या बहुतांशी लोकांच्या मनातल्या विषयावर आज आपण विचार करणार आहोत.  आत्तापर्यंत या विषयाकडे येण्याआधी आपण व्यवसाय सुरु करण्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. व्यवसाय करणे ही मोठी जोखमीची बाब आहे, डेअरिंग - धाडस अशी समजूत अनेकांची असते. पूर्वतयारी न करता व्यवसाय सुरू करणे ही मोठी जोखीम असते हे मान्य.  मात्र, पूर्वतयारी उत्तम झाल्यास यश मिळण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढते हे नक्की. ज्याप्रमाणे परीक्षेतील यशासाठी उत्तम अभ्यास करावा लागतो, त्याप्रमाणे व्यवसायाचे ही आहे.  चांगल्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यानंतरही नापास झाला असे उदाहरण माझ्या अनुभवात नाही. 

 
व्यवसायाची पूर्ण तयारी असल्यानंतर आपल्या मनातील व्यवसायाचे स्वरूप पक्के होते.  व्यवसाय कोणता, कुठे करावा व तो छोट्या का मोठ्या स्वरूपात करावा हे ठरते.  त्या व्यवसायातील बारीक सारीक बाबी, त्यातील आर्थिक बाबी, त्याच्या स्पर्धकांविषयीची माहिती आणि या सर्वांवर बेतलेले आपले अंदाज याबाबत आपली तयारी कागदावर आणि मनात पक्की होते. व्यवसायाच्या जागेच्या जवळच्या ग्राहकांना काय हवे आहे अन आत्ताच्या परिस्थितीत तो किती संतुष्ट आहे हेही आपल्याला माहीत आहे.  साहजिकच, या विषयावर आपण अत्यंत आत्मविश्वासाने बोलू शकतो. 

व्यवसायाची सुरुवात करताना कमीत कमी किती पैसे लागू शकतील ह्याचा विचार फार महत्त्वाचा.  कोणताही व्यवसाय सुरू केल्यावर त्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी वेळ लागतो. स्पर्धकांपेक्षा आपण खूप चांगले उत्पादन किंवा सेवा देत असू तर ग्राहक वर्ग लवकर आपल्याकडे येऊ लागतो.  तरीही, त्यासाठी काही महिने लागू शकतात. या काळात आपल्याला तोटा होऊ शकतो.  तो कमीत कमी होण्यासाठी व्यवसाय सुरू करताना भांडवल कमीत कमी लागण्याच्या दृष्टीने व्यवसायाची आखणी केली पाहिजे. 

भाजीचा व्यवसाय असेल तर सुरुवातीला जास्त काळ टिकणाऱ्या भाज्यांने  सुरुवात करता येईल.  भाड्याची जागा  असल्यास कमीत कमी जागा लागेल तेवढीच घ्यावी. पुढे  लागू शकेल म्हणून जास्त मोठी जागा घेतल्यास त्याचे भाडे जास्त पडेल आणि सुरुवातीच्या काळात आपला तोटाही वाढेल. जागेतील अंतर्गत सजावट न करता मालाची रचना व्यवस्थित करण्यासाठी लागेल तेवढीच व्यवस्था करणे आवश्यक. व्यवसायाच्या सुरुवातीला बाहेरची मदत किंवा नोकर नेमण्यापेक्षा घरातील कोणी किंवा मित्रांपैकी कोणी मदतीला असणे उत्तम. त्यामुळे सुरुवातीचा खर्च कमीत कमी होतो. व्यवसायानुरुप ह्याबाबतीत जेवढे शक्य आहे तेवढे खर्च कमी करणे आवश्यक.  सेवेची उपलब्धता मात्र पूर्णवेळ असणे महत्त्वाचे.  स्वतःकडे भांडवल उपलब्ध असल्यास थोडा जास्त खर्च करावयास हरकत नाही. मात्र कर्ज काढून सुरुवात करताना भांडवलाची गरज आणि खर्च कमीत कमी करणे आवश्यक आहे.

भांडवल आणि खर्चाविषयी आपला विचार पक्का झाला की आपल्याला भांडवल कोण पुरवेल याचा विचार करता येईल.  सर्वप्रथम आपल्याकडे किती पैसा उपलब्ध करता येईल याचा विचार करावा. बँकेतून कर्ज काढायचे ठरवले तरी एकूण गरजेच्या २५% प्रमाणात प्रथम आपण पैसे उभे करावे लागतात.  हे प्रमाण काही योजनांमध्ये कमी असू शकते.  आपल्याकडे तेवढे पैसे नसल्यास आपले आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्यापैकी कोणी तात्पुरते का होईना पैसे द्यायला तयार होईल का याचा विचार करावा.  आत्तापर्यंतच्या जीवनात आपल्याला आजूबाजूच्या लोकांची - नातेवाईकांची - समाजातील काही ज्येष्ठ मंडळींची माहिती झालेली असते. त्यापैकी काही आपल्याबद्दल चांगले मत झालेले असू शकतात.  त्यांच्याकडून मदत होईल का याचा आढावा घ्यावा.  आपल्या व्यवसायाच्या बद्दल केलेली तयारी आणि त्यातून परतफेड करण्याची क्षमता याविषयीची माहिती त्यांना द्यावी.  लागणारे सर्व पैसे एकाच व्यक्तीकडून घ्यावे असे नाही, चार-पाच जण मिळून मदत करणार असतील तरी ती उपयुक्त आहे. मात्र,  त्यानंतर त्या सर्वांना आपल्या व्यवसायाविषयी, प्रगतीविषयी ठराविक काळाने माहिती देणे आवश्यक आहे. कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज घेण्यासाठी असलेल्या अनेक संस्था,  त्यातील फायदे-तोटे इत्यादींचा आपण पुढील भागात आढावा घेऊ.  

---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.


Saturday, July 25, 2020

गोष्ट व्यवसायातील स्पर्धकांविषयीची


                       आतापर्यंतच्या लेखांमधून आपण एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी काय तयारी करावी लागते त्या बाबतीतली माहिती घेतली. या सर्व माहितीनुसार आपण आपल्या ठरवलेल्या व्यवसायाबद्दल तयारी केली. स्वतः त्या व्यवसायामध्ये शक्य तितका अनुभव घेतला. त्याची व्यवहारिक बाजू समजून घेतली. हे सर्व झाले कि पुढील गोष्ट आहे ती आपल्या व्यवसायातील स्पर्धकांविषयीची. 



                  काही व्यवसाय असे असतात कि ते अत्यंत जवळच्या भागातील गिऱ्हाइकांच्यासाठी असतात. लांब राहणारे / वावरणारे लोक आपल्याकडे त्यांच्या गरजेसाठी येण्याची शक्यता कमी असते. उदा. दुध, किराणा, भाजी, चहाची टपरी, कटिंग सलून इ. काही व्यवसाय मात्र मोठ्या भागातील गिऱ्हाइकांसाठी असू शकतात. त्यात कपड्याची दुकाने, खेळणी, पुस्तके, फर्निचर इत्यादी. काही व्यवसाय तर संपूर्ण देशातील ग्राहकांसाठी असू शकतात. त्यात हटके वस्तूंच्या विक्रीचा समावेश असतो. आपल्या असलेल्या व्यवसायानुसार आपण आपल्या स्पर्धकांचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायासारखाच व्यवसाय करणारे आजूबाजूला किती जण आहेत ? त्यांचा प्रत्येकाचा व्यवसाय कसा चालू आहे ? त्यांच्या व्यवसायात गिऱ्हाइकाचे प्रमाण किती आहे ? काही दिवसा / काही वेळेला प्रचंड गर्दी होते का ? त्या व्यावसायिकाचे त्याच्या गिऱ्हाइकांशी असलेले वर्तन कसे आहे ? त्याने लावलेली किंमत रास्त आहे का ? का त्यापेक्षा जास्त आहे ? गिऱ्हाईक समाधानी आहे का त्याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. गिऱ्हाईकाला हवी ती गोष्ट मिळते आहे का ? का त्याला नाईलाजास्तव काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात हे सुद्धा जाणून घ्यावे. एकंदर किती व्यावसायिक स्पर्धक आहेत ते ही महत्वाचे.  
                  नेहमी गर्दी दिसल्यास आपल्या व्यवसायाला चांगला वाव आहे. तुरळक गर्दी असल्यास वाव कमी आहे हे समजावे. त्या परिस्थितीत आपण आजूबाजूच्या परिसरात फिरून आपली जागा बदलल्यास वाव मिळू शकतो का ते पहावे. एखाद्या परिसरात नवीन इमारती होत असल्यास अथवा एखादा मोठा व्यवसाय त्या भागात येणार असल्यास भविष्यात गिऱ्हाइकाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. स्पर्धकांविषयीची संख्या, त्यांच्या कामाबद्दलची माहिती, गिऱ्हाईकांचे त्या व्यावसायिकांबद्दलचे मत अशा गोष्टी जाणून घेऊन आपण आपली योजना, व्यवसायाचे स्थान निश्चित करू शकतो. याबाबत पुढील उदाहरणे उपयोगी पडतील. 
                   पुण्यातील एका उपनगरातील गोष्ट.तिथे चष्म्याचा व्यवसाय सुरु करून १ वर्ष झाल्यावर व्यावसायिकाने दे आसरा फाउंडेशनशी संपर्क केला. त्यांना त्यांच्या व्यवसायात यश येत नव्हते. त्यांचे पुण्यातील दुसऱ्या भागात चष्म्याचे दुकान होते आणि तिथे व्यवसाय उत्तम चालला होता. नवीन व्यवसाय सुरु केला तो आधीच्या दुकानाच्या अनुभवावर आधारित होता.दे आसरा फाउंडेशनच्या तज्ञाने त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर जाऊन पाहणी केली. त्याच्या लक्षात आले कि त्या भागात चष्म्याची ७ दुकाने आधीच म्हणजे ३ ते ४ वर्षे आधीपासूनच होती. ह्या स्पर्धक व्यावसायिकांचे त्या भागात चांगले बस्तान बसलेले होते. त्या प्रत्येकाचे ठराविक गिऱ्हाईक होते आणि त्या गिऱ्हाइकांच्या मार्फत त्यांना नवीन गिऱ्हाईक मिळत होते. व्यावसायिकांनी आपापल्या ग्राहकांना चांगली सेवा / तत्पर सेवा देऊन समाधानी ठेवलेले होते. अशा परिस्थितीत त्या भागात नवे दुकान चालवणे सोपे राहिलेले नव्हते. त्या व्यावसायिकाला त्यांचे व्यवसायाचे ठिकाण बदलण्याचा सल्ला देण्यात आला. नवे ठिकाण ठरवताना तेथील स्पर्धकांची माहिती आणि ग्राहकांची संख्या पाहण्यात आली.नवीन ठिकाण त्या व्यावसायिकाला लाभदायक ठरले  आणि व्यवसाय चांगला चालत आहे. 
                    पुण्यातील उपनगरातील आणखी एक गोष्ट. ह्या व्यावसायिकाने एक खानावळ सुरु केली. अत्यंत माफक दरामध्ये मर्यादित थाळी पण बहुतेकांसाठी पोटभर अशी. त्या व्यावसायिकाने इतर काही जबाबदाऱ्यांमुळे हा व्यवसाय एका माहितीच्या माणसास चालवायला दिला. वर्षभराने ह्या माणसाने स्वतः ह्याच्या जागेच्या शेजारची जागा घेऊन खानावळ सुरु केली. ह्या माणसालाच सगळे ग्राहक ओळखत असल्याने सर्वजण त्याच्या खानावळीत जाऊ लागले व व्यावसायिकाची खानावळ ओस पडली. महिन्याभराने त्याने दे आसरा फाउंडेशन ला संपर्क केला. फाउंडेशन च्या तज्ञाने व्यवसायाच्या जागेला भेट दिली. शेजारच्या खानावळीचे स्वरूप पाहिले. त्यावरून आता पुन्हा खानावळ चालविणे अवघड दिसले. त्यामुळे व्यवसायात बदल करावा लागेल असे लक्षात आले. त्यासाठी खाद्य उद्योगातीलच कोणते पदार्थ असावेत ह्याचा परिसरात फिरून अभ्यास सुरु केला. बहुतेक सर्व पदार्थांचे उद्योग आजूबाजूच्या भागात चालू होते अन त्यात वाव कमी होता. परिसरात अनेक लोक मूळचे खान्देशातील आहेत हे ही लक्षात आले. मग खान्देशातील लोकांना आवडणारी कचोरी बनवायचा निश्चय करून व्यवसाय सुरु झाला. अल्पावधीतच तो चांगला वधारला कारण तो पदार्थ जवळच्या परिसरात कोणीही बनवत नव्हते. मग कचोरीबरोबर इतर पदार्थ हि तो बनवू लागला आणि सुस्थापित झाला. 
                 व्यवसायाचे स्थान, त्यातील स्पर्धक, गिऱ्हाइकाचे प्रमाण, व्यवसायवाढीच्या शक्यता ( आजूबाजूच्या परिसराचा विकास ) ह्या सर्व गोष्टी व्यवसाय सुरु करताना विचारात घ्याव्यात. रेल्वे स्टेशन, एस टी स्टॅन्ड,  शाळा / कॉलेजेस, सरकारी कार्यालये, मुख्य बाजारपेठ ह्या ठिकाणी एका व्यवसायाचे अनेक स्पर्धक असतात. ते सर्व यशस्वी होतात कारण तेथे अनेक ग्राहक आजूबाजूच्या परिसरातून येत असतात. इतर ठिकाणी ही शक्यता कमी असते. 

 ---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Friday, June 12, 2020

उद्योग संधी हेरली, आता पुढे काय ?

                  मी उद्योग व्यवसाय करू शकतो का ? ह्या मनातल्या विचारांना चालना देऊन आपण वेगवेगळ्या उद्योगसंधींचा विचार केला. संधींचा विचार करताना कशा कशाचे भान ठेवायला पाहिजे त्याचाही विचार केला. आपल्याकडे पैसे आहेत, जागा आहे किंवा काही प्रमाणात ज्ञान आहे एवढंच उद्योग यशस्वी करण्यासाठी पुरेसं  नसतं हे ही आपण पाहिले. उद्योगसंधीकडे कशाप्रकारे पहावे, आपण त्यातील कोणती संधी निवडावी हे अनेक गोष्टींवर ठरते हे ही आपण जाणून घेतले.    


                             जो उद्योग आपण करू इच्छितो, त्या उद्योगातील वेगवेगळ्या गोष्टी शिकणे, माहिती करून घेणे, त्याचा शक्य तितका अनुभव घेणे ही पुढची महत्वाची पायरी. प्रत्येक छोट्या व्यवसायात सुद्धा अनेक खाचाखोचा असतात. त्या प्रत्यक्ष काम केल्याशिवाय कळणे शक्य नसते. आपल्या घरात अनेक वर्षे पोळ्या करताना पाहून स्वतःला पोळ्या करता येत नाहीत. तसेच अनेक जणांना पोहताना पाहून आपल्याला आपोआप पोहता येत नाही. त्यासाठी स्वतः पाण्यात उतरून, अनुभवी मंडळींच्या मदतीने सुरुवात करावी लागते आणि मग काही काळ स्वतः पोहून वेगवेगळे प्रयोग करून सगळे बारकावे शिकून घ्यावे लागतात. उद्योग कितीही छोटा असला तरी त्यातले बारकावे माहिती करून घेऊन मग उद्योगास सुरुवात केली कि अडथळे कमी येतील आणि आपला आत्मविश्वासही वाढलेला असेल. कित्येक जणांना उद्योगातील आर्थिक बाजूची पूर्ण कल्पना नसते. त्यातील तांत्रिक बाजू माहिती असून भागणार नाही. व्यावहारिक  बाजूही पूर्णतः माहिती पाहिजे. एखादी गोष्ट बनवताना ती आपल्याला केवढ्याला पडली आणि ती काय किमतीला विकणे हे फायद्याचे होईल याची संपूर्ण माहिती करून घ्यायला पाहिजे. खाद्य उद्योगात तर अशी माहिती फार महत्वाची. बाजारामध्ये अनेक स्पर्धक असणार. त्यांच्या विक्रीच्या किमतीपेक्षा आपण जास्त किंमत लावू शकणार नाही. कित्येकदा तयार खायचे पदार्थ पूर्ण न खपल्याने वाया जातात. अचानक पाऊस किंवा इतर कारणाने विक्री कमी होते. अशा वेळेला नुकसान होऊ नये म्हणून  काय करावे ? महिन्याभरात असे कितीदा अनुभव येतात ?  पदार्थासाठीचे लागणारे  सामान कसे तपासून घ्यायचे ? उन्हाळ्यात पदार्थ टिकावे, खराब होऊ नये म्हणून काय करायचे ? अशा अनेक गोष्टींचा विचार करून आपल्याला विक्रीची किंमत ठरवावी लागते. भाजी, फळे, शीतपेये, सकाळच्या वेळी फिरणाऱ्या लोकांसाठी आरोग्य पेय विकणारे, सगळ्यांना हा विचार करणे आवश्यक आहे. पुस्तक विक्री, स्टेशनरी, किराणा माल, औषध विक्री, अशा अनेक व्यवसायांमध्ये माल खराब किंवा वाया जाणारा (expiry) असू शकतो. त्याचा विचार न केल्यास नुकसान होऊ शकते. 
                              उद्योग व्यवसायासाठीचा महत्वाचा भाग म्हणजे आपला ग्राहक. आपले सर्व विचार, निर्णय हे त्या ग्राहकाच्या गरजेवर, त्याच्या पसंतीवर, त्याच्या आवडीनिवडीवर आणि त्याच्या परवडण्यावर अवलंबून असतील. ग्राहकवर्ग हा जेष्ठ नागरिक, पगारी नोकरवर्ग, सरकारी कर्मचारी, महिलावर्ग, मजूरवर्ग, उद्योग / व्यावसायिक  अशा सगळ्या घटकांचा  असतो. या वेगवेगळ्या घटकांना काय हवे आहे ( उच्च गुणवत्ता / ब्रँडेड /चांगले  पण कोणताही ब्रँड / स्वस्त आणि छोट्या पॅकिंग मधले ) त्यांना घरपोच सेवाही हवी आहे का ? त्यांचा आर्थिक स्थर ( महिन्याची मिळकत ) कशी आहे अशी माहिती मिळवायला पाहिजे. आरोग्यपूर्ण सेवेला किती महत्व दिले जाते, दुकान किंवा सलून किंवा कपडे धुलाई केंद्र यासाठी  त्याचा आकार, त्यातील मांडणी, रंगरंगोटी इ. गोष्टी त्या अपेक्षेनुसार करावी लागेल. एकंदरीत ग्राहकाच्या अपेक्षा माहिती करून त्या पूर्ण करण्याची तजवीज करावी लागेल. 
                                     ग्रामीण भागात किंवा शेतीमालावर अवलंबून असलेला व्यवसाय असला तरी त्यासाठी सुद्धा त्याचा ग्राहकवर्ग कोणता हे जाणून घेऊन त्याप्रमाणे व्यवसायाची तयारी करणे आवश्यक. काही हटके व्यवसायही विचारात घेतले पाहिजेत. नारळ विक्रेते अनेक असतात. एकाने नारळ विकणे सुरु केले. त्याचबरोबर सोलून देणे, फोडून देणे, त्यातील पाणी कागदी ग्लासात देणे, तो खोवून देणे, अशा सेवा जोडल्या. महिन्याभरात त्याच्याकडे ग्राहकांची गर्दी होऊ लागली. कित्येकांच्या घरात नारळ फोडायची आणि खोवायची सोय नाही हे ओळखून त्याने हा व्यवसाय सुरु केला. नुसत्या नारळ वाल्यांपेक्षा ह्याचा व्यवसाय दस पटीने जास्त आहे.       
    
  ---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Tuesday, May 26, 2020

उद्योग संधी कशी हेरायची ?? ( भाग - 2 )

आपण समाजात वावरताना ज्या वस्तुंचे व्यवहार करत असतो, त्या व्यवहारांकडे बारकाईने बघण्याची सवय करुन घेणे गरजेचे आहे. ज्वारीच्या लाहीचे  १०० ग्रॅम चे पाकिट ३० रु. मिळते. हे पाहिल्यावर ह्या व्यवहारात लाही बनविणाऱ्या  व्यक्तीला काय फायदा मिळत असेल, त्याचा हिशोब मनात यायला पाहिजे. ऑटोरिक्शा मधे बसल्यावर मीटरवर येणारे आकड़े - उदा. किती अंतर, किती पैसे, किती वेटींग टाइम - सिग्नल वगैरे ला थांबल्यावर - ट्रैफिक जाम असल्याने इ. ते नीट पाहिल्यावर समजते की रिक्शाचे भाड़े अंदाजे १२ रु. दर कि.मी. दराने द्यावे लागत आहे. हे तर साध्या चार चाकीच्या भाड्यासारखे आहे. फरक इतकाच महत्वाचा की चार चाकी गाड़ी अशी ३-४ कि.मी. साठी उपलब्ध नाहीये. 

देआसराच्या वेबसाइट www.deasra.in वरती आपणा सर्वाना वेगवेगळ्या आणि अत्यंत नेहमीच्या असणाऱ्या ७० उद्योगांची मार्गदर्शकपर माहिती उपलब्ध आहे. हे उद्योग आपणाला सर्वच ठिकाणी दिसतात आणि चांगले चालतात.  त्यापैकी काही उद्योग आपणांस उपयोगी ठरायची शक्यता आहे. 


उद्योग कोणता करायचा हे ठरवताना स्वतःच्या मनातल्या विचारांना, स्वतःच्या आवडीला, स्वत:च्या स्वप्नांना जरूर महत्व दया. त्याचबरोबर काही गोष्टींना बळी पडू नका. ह्याबद्दलची काही उदाहरणे देतो. 

एक युवक म्हशी पालनाचा उद्योग सुरु करायला आला. त्याच्या मामांचा गोठा भोर जवळच्या गावात होता आणि तो त्यानी लहानपणी पाहिलेला होता. त्याचे गाव सांगलीजवळ होते अन तेथे तो १० म्हशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु करणार होता. हा व्यवसाय नवीन माणसाने करण्यासारखा नाही.  तो पूर्णपणे समजून घेण्यासाठी मामांच्याकडे राहून सर्व गोष्टी शिकून घेण्याविषयी सुचवले. मामा अगदी जवळ असता तर त्याने मदत केली असती पण,   तो बराच लांब आहे त्यासाठी स्वतः सर्व गोष्टी - हा उद्योग, त्यातील खाचाखोचा, त्यातील पैश्याचे व्यवहार, त्यातील धोके, अडचणी व त्यावरील उपाय, ह्या सर्व गोष्टी बारकाईने शिकणे आणि आत्मसात करणे अत्यंत आवश्यक. सांगलीजवळ त्याला चांगला माहितगार माणूस मिळू शकला असता. परंतू, त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून रहावे लागले असते. शिवाय, उद्योगाचे संपूर्ण भवितव्य त्या व्यक्तीवर सोडवे लागले असते. त्या युवकाने मामाकडे एक वर्ष राहून त्यानंतर स्वतःचा उद्योग सुरु केला. 

एक पिता - पुत्र व्यवसाय मार्गदर्शनासाठी आले. मुलगा नुकताच इंजीनियर झाला होता आणि त्याचे   वडील ३७ वर्षे  एका मोठ्या कारखान्यात काम करुन निवृत्त झाले होते. त्यांच्या कारखान्यात ते स्टिल फॅब्रिकेशनच्या डिझाइनचे काम पाहात होते. त्यांना स्वतःला प्रत्यक्ष कामाचा अनुभव नव्हता आणि मुलाला  कुठलाच अनुभव नव्हता. त्यांना घरासाठी लागणारे ग्रील, सेफ्टी डोर, जीना अश्या प्रकारचे वेल्डिंग करुन वस्तू तयार करण्याचा उद्योग सुरु करायचा होता.  निवृत्तीनंतर मिळालेले पैसे त्यांच्याकडे होते आणि त्यामुळे त्यांना उद्योग सुरु करायला अडचण   वाटत नव्हती. त्या दोघांनाही ह्या उद्योगासाठी लागणारे भांडवल,  स्टील कोठून आणायचे, भाव काय, वस्तूची किंमत ( विकण्यासाठी ) कशी ठरवायची, पेंटिंग, पावडर कोटिंग, प्लेटिंगचे सध्याचे दर, एकंदरीत असलेला उद्योगासाठीचा स्कोप, अश्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला नव्हता. वडील जरी अनुभवी नसले तरी त्यांचा अनुभव हा मोठ्या कंपनीतला होता, ज्यामधे प्रत्येक कामासाठी वेगळा माणूस असतो आणि व्यावहारिक बाजूंची  ( किंमती / खर्च  / वेगवेगळे कर / करांचा परतावा ) फारच कमी लोकांना माहिती असते. हे सगळे मुद्दे समजावून सांगितल्यावर वडिलांनी मान्य केले की बरीच तयारी करणे आवश्यक आहे. मुलाने एका अशा  उद्योगात काम करुन अनुभव घ्यायचे ठरविले अन ते दोघे पुढील तयारीसाठी निघून गेले.   

पन्नाशीच्या एक महिला त्यांच्या मुलीसोबत मार्गदर्शनासाठी आल्या. त्यांना मसाल्याचा व्यवसाय करायचा होता. त्यांनी ज्यांना ज्यांना मसाला बनवून दिला त्या सर्वांना तो मसाला आवडला होता. म्हणून त्यांना त्या व्यवसायात शिरायचे होते. त्यांनी मसाला ज्यांना दिला होता ते सर्वजण त्यांच्या चांगल्या परिचयाचे होते. मी त्यांना पन्नास सैंपल्स बनवून अपरिचित अशा लोकांना पाठवायला सांगितले. ज्यांना आवडेल त्यांनी तसे कळविल्यास प्रत्येकाला २०० ग्रॅम मसाला मोफत पाठविला जाईल, असे त्या सैंपल वर लिहिले होते. पुढील एक महिन्यात कोणीही त्यांना सैंपल आवडल्याचे कळविले नव्हते. परिचयाच्या लोकांनी खरेखुरे मत दिले नसावे असे वाटले. त्यांनी हाच प्रयोग आणखी पन्नास लोकांवर करूनही कोणीही त्यांना संपर्क केला नाही. आपली वस्तू खरोखरच ग्राहकास चांगली वाटते आहे का ? हे नक्की झाल्याशिवाय त्यावर उद्योग सुरु करणे जोखमीचेच की !!
त्यांनी मसाल्याच्या व्यवसायाचा विचार सोडून दिला. 

वरिल उदाहरणे ही व्यवसाय किंवा उद्योग ठरविताना काय विचार करावा हे कळण्यासाठी दिली आहेत. काही गैरसमजूतीतून उद्योग सुरु करू नयेत ह्या साठी दिलेली आहेत.  


---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.


















Friday, May 15, 2020

उद्योग संधी कशी हेरायची ?? ( भाग - 1 )

उद्योग कोणता  करावा हा प्रश्न बहुतेकांना पडलेला असतो. दे आसराच्या कार्यालयात अनेक जण हा प्रश्न विचारण्यासाठी येत असत. मी  नेमका कोणता BUSINESS करू असे ते विचारत असत. कोणत्याही व्यक्तीविषयी फारशी माहिती नसताना अशा प्रकारचे उत्तर देणे अशक्य असते. कारण,
व्यक्ती, तिची शैक्षणिक पात्रता, कौटुंबिक परिस्थिती, व्यवसायाबद्दलची मानसिकता, कुटुंबाचा असणारा व्यवसायाबद्द्लचा दृष्टिकोन,व्यावहारिक जगाचा अनुभव, कौशल्य संपादन, राहण्याचे ठिकाण अशा अनेक गोष्टींवर व्यवसाय कोणता करावा ह्याबद्द्ल ठरवता येऊ शकते. अर्थात त्यातील काही गोष्टी अनुकूल नसताना सुद्धा व्यवसाय सुरु करुन यशस्वी झालेल्या व्यक्तींची उदाहरणे पहावयास मिळतात पण ती अपवादात्मक असतात. 



आपल्या गावात किंवा जवळच्या गावात, तालुक्याच्या गावात तसेच शहरात सुरु असलेले अनेक व्यवसाय आपण पाहतो. त्यातले काही व्यवसाय आपणही करू शकतो. मात्र त्या साठी तो व्यवसाय ज्या ठिकाणी सुरु करायचा त्या ठिकाणी त्या व्यवसायाच्या उत्पादनाला किंवा सेवेला मागणी असली पाहिजे.  एखाद्या छोट्या गावात एकाच व्यवसायाची अनेक दुकाने चालविण्याची शक्यता कमी असते. आपण जो व्यवसाय करू इच्छितो त्यासाठी किती मागणी आहे अन सध्या ती मागणी कोण पुरवत आहे, मागणी पुरविणाऱ्या बद्दल काय मत आहे, त्याची किंमत, दर्जा आणि सेवेवर त्याचे ग्राहक समाधानी आहेत का ? आपण व्यवसाय सुरु केल्यावर आणि चांगली सेवा दिल्यावर गिऱ्हाईक आपल्या कड़े येण्याची शक्यता आहे का ? हा विचार करणे आवश्यक आहे. तसेच आपण राहतो त्या ठिकाणी अथवा आपण ज्या भागात नेहमी जातो त्या ठिकाणी आपल्याला असे काही कळाले आहे का ? जे त्या भागातील लोकांना हवे आहे पण उपलब्ध नाही, हवे आहे पण महाग मिळत आहे, हवे आहे पण चांगल्या दर्जाचे मिळत नाही, अशा परिस्थितीतही लोकांची गरज पुरविण्याची संधी आपल्याला मिळू शकते. 

काही वेगळा विचार करुन ज्या गोष्टींची गरज सुप्त आहे ती ओळखून व्यवसाय सुरु करणे शक्य आहे. वेगवेगळ्या गृहनिर्माण संस्थेमधील ज्येष्ठ नागरीक, महिला व मुला / मुलींना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार बुद्धिबळ शिकवणे हा त्यातील एक. शाळांच्या सहलीची जबाबदारी घेऊन मुलांना सहलीला नेवून सुखरूप परत आणणे हा दूसरा. यामधे शैक्षणिक सहल, करमणूक सहल , सामाजिक सहल, धार्मिक सहल अशा अनेक सहलींचे आयोजन करता येते. शाळा, गृहनिर्माण संस्था, महिलांचे भिशी मंडळ, अशा अनेक समुहांसाठी  ह्या व्यवसायाला वाव आहे. वेगवेगळ्या घरगुती समारंभासाठी त्यांच्या आवडीचा केक बनवून तो त्यांच्या सोयीनुसार घरी पोहोचवणे ( रात्री ११:३० वाजता ) हा सुद्धा असाच एक ' हटके ' व्यवसाय.

ग्रामीण भागातील युवकांसाठी सुद्धा अनेक पर्याय आहेत. नजीकच्या शहरातील ग्राहकांना त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी  पुढाकार घेऊन, त्यांना हवे ते, हवे तेव्हा अन हव्या त्या स्वरुपात पुरवणे. ह्या मधे उत्पादक शेतकरी ते ग्राहक असा संबंध असल्याने किंमत चांगली मिळते आणि अनेकांना काम मिळते. कचऱ्यातून खत, गाईच्या दुधापासून पंचगव्यापर्यंतची उत्पादने, पालापाचोळ्यापासून काही उत्पादने बनवणे शक्य आहे. सोललेला लसूण रोज निरनिराळ्या हॉटेल्स, केटरर्सना पुरविणे, पनीर बनवून रोज ठिकठिकाणी पुरविणे, सिताफळाचा ' गर ' काढून रबड़ी, आईस्क्रीम, मिल्कशेक उत्पादकांना पुरविणे, अशा प्रकारचा व्यवसाय ही असू शकतो. सेंद्रिय (Organic ) उत्पादने, त्यासाठी अनेक शेतकऱ्यांबरोबर समुहाने उत्पादन करणे व वितरित करणे, ( त्यात दूध व दुधापासूनचे पदार्थ ) ह्याला ही मोठा वाव आहे. 

यशस्वी उद्योजकच्या अंकातून अशा अनेक व्यवसायांविषयी माहिती असल्याने तो नियमित वाचल्यास त्यातून काही ' Business Ideas ' नक्की मिळतील. 

---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Saturday, May 9, 2020

मी उद्योग व्यवसाय करू शकतो का ??

उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मनात वरील प्रश्न डोकावत असतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल लागू शकते, शिवाय त्या व्यवसायाबद्दल अनुभव / माहिती असणे जरूरीचे असू शकते. व्यवसाय म्हणलं की यश मिळेल का ? याबाबत शंका / कुशंका येऊ शकतात. अपयश आल्यास आपले आप्तस्वकीय आपल्याला काय म्हणतील  त्याबद्दलही मनात विचार येऊ शकतात. ह्या सगळ्या मनातील विचारांचा परिणाम आपल्या पुढील कृतीवर होतोच.


खरं तर आपण आपल्या लहानपणापासून अनेक उद्योग खूप जवळून पाहात असतो. अनेक उद्योग हे कमी भांडवलात होऊ शकतात हेही समजलेले असते. भाजी /फळे, खाद्यपदार्थांची विक्री , स्टेशनरीचे दुकान, गोळ्या बिस्किटांचे दुकान, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, फुलांची / हाराची विक्री, फुलगुच्छ बनवून विक्री, केशकर्तनालय, शिवणकाम, ऑटोरिक्षा / टॅक्सी चालवणे अशा उद्योगांपासून ते छोट्या स्वरुपाचा कारखाना उभा करण्यापर्यंत अनेक उद्योग आपण पाहिलेले असतात.  त्या उद्योजकांशी आपण बोलले देखील असतो. त्यातील काही चांगल्या माहितीचे झालेले असतात.

आपण विचार केला पाहिजे की त्यातील बहुतांशी जण आपल्या सारखेच असतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी / शिक्षण आपल्यासारखीच असते. म्हणजे ते जे काही करत आहेत, ते आपल्यालाही जमायला पाहिजे. त्यांना जे यश मिळाले आहे त्यांच्या व्यवसायात, तसे मलाही मिळायला हरकत नाहीये. त्यांच्या व्यवसायाच्या बळावर ते त्यांचे घर व्यवस्थित चालवत आहेत, तसे मलाही चालवता आले पाहिजे.   अर्थात यश मिळवण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे उमेदवारी / कष्ट केले, यशासाठी धडपड केली,कसोटीच्या काळात संयम बाळगला, त्याप्रमाणे मी सुद्धा ह्या सर्व गोष्टी केल्या  पाहिजेत अन त्यासाठी माझी तयारी आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मनाला आश्वस्त केल्यावर पुढील विचार करायला सुरुवात केली पाहिजे. कोणताही उद्योग करण्याचा विचार करताना प्रथम आपल्या ग्राहकाचा विचार महत्वाचा. आपण आपला हा उद्योग ज्या भागात करायचा त्या भागातील संभाव्य ग्राहकांची गरज काय आहे आणि आपण ती कशा प्रकारे भागवू शकतो ?

ग्राहक आपल्याकड़े येण्यासाठी आपण काय करू शकतो ? ग्राहकांची गरज आता कोण भागवत आहे आणि त्या मंडळींपेक्षा, दर्जा , किंमत, उपलब्धता ह्यापैकी कोणती गोष्ट मी ग्राहकाला जास्तीची देऊ शकतो ? चांगला दर्जा असला तर किंमत जास्त असूनही ग्राहक त्याला पसंती देऊ शकतो. व्यवसायाच्या जागेच्या अवती भवती आपले ग्राहक आहेत का ? ते संख्येने किती आहेत त्याचाही अंदाज महत्वाचा. बाजारपेठेतील जागा असल्यास गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल. त्या ठिकाणी गिऱ्हाईकांची संपूर्ण सोय ( त्वरित पुरवठा / विक्री करण्याची व्यवस्था आणि मालाची उपलब्धता ) हा महत्वाचा भाग असेल.

ग्रामीण भागातून शेतीमाल / फळे आणवून घेवून वेगवेगळ्या कंपन्यांच्या किंवा सहकारी गृहसंस्थेच्या आवारात विक्री करणे, शेतमालावर प्रक्रिया करुन ( निवडणे, स्वच्छता करणे, चिरणे, सोलणे अशा सारख्या प्रक्रिया ) आधी आर्डर घेऊन त्याप्रमाणे घरोघरी पुरवठा करणे, फणस, डाळिंब, पपई सारख्या फळांवर काम करून खाण्यास सुलभ करुन विकणे,  अश्यासारख्या व्यवसायाला बराच वाव आहे. ह्या गोष्टींचा जम बसवायला वेळ लागतो पण त्यानंतर पुढील प्रवास सुखकर होतो. शहराच्या उपनगरात अश्या प्रकारच्या  व्यवसायाला चांगलाच वाव आहे.

---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Wednesday, April 15, 2020

मनातील उद्योगाविषयी पुढचे पाऊल ..!

               
 दे आसरा फाउंडेशन सुरु होऊन आतावर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. ह्या काळात अक्षरशः हजारों व्यक्तींची प्रत्यक्ष भेट झाली. अशा व्यक्ती की ज्यांना स्वतः व्यवसाय करण्याची ईच्छा होती अणि नेमके काय करावे हे नक्की करता येत नव्हते. मनात कोणता व्यवसाय करावा अन कोठे जागा निवडावी, ह्याबद्दल विचार केलेला असायचा पण मनात भीती असायची की सगळं आपल्याला जमेल ना ? समजा नाही जमले तर घरातले अन आजूबाजूचे आपल्याला काय म्हणतील ? घरातला महिलावर्ग आत्ताच आपल्याला विरोध करीत आहे. ह्या परिस्थितीतील व्यक्तींना मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते.
                    मार्गदर्शक असा की ज्याने ह्या इच्छुक उद्योजकाला समजून घेऊन त्याच्या विचारांना दिशा देण्याचे काम केले पाहिजे. विचारांमधील त्रुटी लक्षात घेऊन त्या दूर करण्याचे काम केले पाहिजे. उद्योगातील जोखिम लक्षात आणून देऊन ती कशी कमीतकमी होईल  यासाठीचे उपाय सुचविले पाहिजेत. त्याचबरोबर एखाद्या अव्यवहार्य ( NOT Feasible) विचारांची जाणीव करुन द्यायला पाहिजे.
                    असा मार्गदर्शक कोठे मिळेल ? असा मार्गदर्शक जे सांगेल ते योग्य असेल का ? त्याच्या भरवशावर आपण पुढील वाटचाल करावी का ? सर्वसाधारणपणे आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण अशा काही व्यक्ती पहिलेल्या असतात की ज्या स्वतः चांगल्या माहितगार असतात, ज्यांना व्यावहारिक जगाचा भरपूर अनुभव असतो. आपल्याच शाळेतले / कॉलेजातील शिक्षक, नात्यातील काही व्यावसायिक  / उद्योजक , आपल्या गावातील काही यशस्वी व्यापारी / उद्योजक, आपल्या मित्रांच्या नात्यातील काही व्यक्ती यापैकी कोणीतरी आपल्या डोळ्यासमोर येतील.  त्यांच्याशी विविध प्रकारे संपर्क साधुन आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करू शकतो.
                            आपल्याला उद्योजकतेविषयी आणि आपल्या विचारातील उद्योगाविषयी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा न करता, त्याविषयी काही सुचना, वेगळा दृष्टिकोन मिळेल अशी अपेक्षा ठेवली पाहिजे.  त्याचा उपयोग आपल्याला काही प्रमाणात नक्की होईल. संपूर्ण मार्गदर्शनासाठी अर्थातच आपल्याला देआसरा फाउंडेशनला ( फोन नं - 8669985599 ) संपर्क करावा लागेल. त्यांचे काम ह्या संचारबंदीच्या काळातही सुरु आहे. सोम-शुक्र. सकाळी १० ते संध्याकाळी ६ ह्या वेळेत. ह्या संबंधातिल काही उदाहरणे आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील.

१.
         एका चष्म्याच्या उद्योजकाला आपले दुकान चालत नसल्याने दुसऱ्या परिसरात हलवावे लागले.  ते चालले नाही कारण त्या परिसरात चष्म्याची  अनेक दुकाने खुप आधीपासून सुरु होती अन परिसरातील रहिवाश्यांबरोबर  त्यांचे  चांगले संबंध जोडले गेलेले होते. उद्योजकाला ह्या व्यवसायाविषयीची बाजू आणि अनुभव असूनही  त्याला यश मिळाले नव्हते.

२.
        एका अल्पउत्पन्न रहिवाश्यांच्या परिसरात एकाने अत्यंत उच्च दर्जाच्या किराणामालाचे दुकान सुरु केले. त्या दुकानातील माल हा एका उत्कृष्ठ दर्जाच्या ब्रँडचा   होता आणि त्याच्या किमती खुप जास्त असत. साहजिकच त्या परिसरामध्ये ह्या दुकानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वर्षभरात ते दुकान बंद करावे लागले.

 ३.                      
       एका महिलेने तिच्या शिवणकामाच्या कौशल्यावर स्त्रियांचे कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यात तिला चांगले यश मिळाले. तिचे दुकान हमरस्त्यापासून आतल्या बाजूला होते. काही वर्षांनी तिच्या शेजारचे दुकान उपलब्ध होते आहे असे पाहून तिने तेथे तयार कपड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी तिने बॅंकेकडून कर्ज घेऊन मालाचा पुरेसा साठा केला, दुकान हमरस्त्यापासून दूर असल्याने त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि ६ महिन्यात नवीन माल न आणल्याने माल खपेना. शेवटी सगळा साठा ठोक पद्धतीने ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना विकून उद्योगातुन बाहेर पडावे लागले.

वरील उदाहरणावरून लक्षात येईल की आपल्या उद्योजकीय प्रवासासाठी आपल्याला कशा पद्धतीने विचार करावा लागेल. उद्योगाच्या अनेक पैलूंचा विचार आपल्या योजनेमध्ये केला तर उद्योग यशस्वी होण्याची शक्यता जवळ जवळ  १००% होईल.    



---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.




   

Tuesday, April 7, 2020

उद्योजक आणि आरोग्याचे महत्त्व !!

 नुकतेच CBSE चे ९वी चे पुस्तक वाचण्यात आले. त्यामधे दूसरा धड़ा आहे ' People As Resource ' या नावाचा.  त्यामध्ये त्यांनी मनुष्यबळाच्या उत्पादकतेविषयी भाष्य केलेले आहे. मनुष्य हा शिक्षित व कौशल्य प्रशिक्षित असल्यास तसेच आरोग्यपूर्ण असल्यास उत्पादन होऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळ खुप जास्त असले तरी ते ' बोजा ' न बनता हुकमी पत्ता बनू शकते. पुढे त्या धड्यामधे सरकारने केलेल्या यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, कौशल्य शिक्षण, उद्योजकता व त्याविषयीच्या योजना यांच्याविषयी माहिती आहे. तसेच आरोग्यसेवा सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले त्याविषयी माहिती आहे. 

खरे तर कोणत्याही गोष्टी करत असताना प्रत्येकाने आरोग्याकडे तेवढेच लक्ष देणे महत्वाचे आहे. विद्यार्थीदशेतही केवळ अभ्यास एके अभ्यास करुन चालत नाही. परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी तब्येत चांगली राखणे तितकेच महत्वाचे असते. कितीतरी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आजारपण येते अन  मग त्या अत्यंत महत्वाच्या काळात मनासारखा अभ्यास केला जात नाही. आरोग्याकडे चांगले लक्ष दिल्यास परीक्षा आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने दिली जाते अन उत्कृष्ठ यश मिळू शकते. 



उद्योजकाला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे अगदीच अत्यावश्यक !! 

त्याच्या उद्योगात / व्यवसायात त्याला पूर्णपणे लक्ष द्यावे लागते. शिवाय उद्योगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी धावपळ करावी लागते. उद्योग चालू असताना वेळोवेळी येणाऱ्या बदलांसाठी जागरूक राहून त्वरित निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक ताण तर नेहमीचीच गोष्ट, त्यासाठी मानसिक शांतता राखुन निर्णय घेणे, वेगवेगळ्या लोकांशी संवाद करणे गरजेचे.  त्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य राखणे अत्यावश्यक ठरते. उद्योजकाने त्याचे ज्ञान, अनुभव आणि आर्थिक बळ सर्वच गोष्टी त्याच्या उद्योगात / व्यवसायासाठी गुंतवलेल्या असतात. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना वेळ दिलेला नसतो. या सर्व गोष्टींची गुंतवणूक त्याने केलेली असते. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून तो ही गुंतवणूक फलदायी कशी करणार ? 

उद्योजकाचा बराचसा दिवस योजनाबद्ध नसतो. घडणाऱ्या गोष्टींनुसार त्याला आयत्या वेळेत बदल करावे लागतात.त्याचा प्रवास (जवळपासच्या भागात / वेगवेगळ्या शहरात), अवेळी खाणे-पिणे, उन्हा-तान्हात,धुळीत वावरणे, रात्री  उशिरापर्यंत काम, अशा अत्यंत अनिश्चित पद्धतीने त्याची दिनचर्या असते. त्याला आरोग्यसल्ला देताना या गोष्टीचा विचार करणे फार महत्वाचे आहे. तसे नसल्यास असा सल्ला फारसा उपयोगी पडणार नाही. 

उद्योजकतेवरील बऱ्याचशा पुस्तकांमध्ये उद्योग सुरु करण्यापासून ते तो चांगला यशस्वी करण्यावर भर दिलेला आढळतो. या परिस्थितीत आरोग्य कसे राखावे  यावर मात्र यशस्वी उद्योजक ह्या मासिकाने भर दिला आहे. सुरुवातीला कै. डॉ. एच्. व्ही. सरदेसाई यांचे मार्गदर्शन तर त्यानंतर डॉ. प्राची साठे यांचे उपयुक्त असे लेख आहेत.  मानसिक आरोग्यासाठी आतापर्यंत डॉ. अंजली पेंडसे, डॉ. संज्योत देशपांडे आणि आता डॉ. राजेंद्र बर्वे यांचे लेख आहेत.

उद्योजक यशस्वी होण्यासाठी त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे त्याने लक्ष पुरवावे ह्यासाठी ' यशस्वी उद्योजक ' ह्या मासिकाद्वारे केलेला प्रयत्न..!!


आज ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन..!! 

उद्योजकांना त्यांच्या उद्योगामध्ये ' आरोग्यपुर्ण ' यश मिळो ही शुभेच्छा.. !!

----- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Wednesday, April 1, 2020

वेळेचा सदुपयोग - उद्योजकीय विचारांसाठीचा..!!

सध्याच्या ह्या कोरोना संकटाच्या काळात अनेकजण घरात बंद आहेत. एका दृष्टिकोनानुसार हा काळ विचार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण कोरोना हा विषय अतिशय गंभीरतेने घेतलेला असेल आणि त्या संबंधातील सूचनांचे तंतोतंत पालन केले असेल तर आपल्याला कोरोना संबंधित काळजी करण्याचे कारण नाही. 
घरातील कामे संभाळून आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो आहे, आपल्या जवळच्या मित्रांना / नातेवाइकांनाही  भरपूर वेळ आहे. फोनवर बोलायला, आपल्याला हवी असलेली माहिती शोधून काढायलाही आपल्याकडे वेळ आहे. घरातील सात्विक जेवण जेवल्याने तब्येतही चांगली असणार आहे. 

आपल्या भविष्याबद्दलच्या योजनांचा विचार करण्यासाठी उपयुक्त असा हा काळ आहे.


आपल्यापैकी काही असतील नोकरदार मंडळी. त्यातील काही फारसे खुश नसतील सुरु असलेल्या नोकरीबद्दल,काहींना खातेबद्दल करावा वाटतं असेल तर काहींना नोकरी बदलावी असाही विचार असेल. काहींना असे पर्यायही शक्य वाटतं नसल्यानं सहनशक्ती वाढवून सध्याचे दिवस पुढे रेटण्याचा विचार सुरु असेल.त्यांच्यासाठीच हा ' घरबंदी ' चा काळ त्यांच्या मनातल्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठीची योजना बनवण्यासाठी उपयुक्त असेल.

आपल्यापैकी काहींचे शिक्षण झालेले असूनही अजून नोकरी न लागलेले असतील, शिक्षणानंतर अनुभव मिळवण्यासाठी कित्येकजण नगण्य अशी नोकरी करत असतील, कोणताच पर्याय डोळ्यासमोर नसल्याने जे मिळाले आहे त्याला स्वीकारून पुढे वाटचाल करीत असतील, असे जरी असले, तरी आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आणि आपल्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी आपण काहीतरी वेगळे करावे असे मनात मात्र येत असेलच. आजूबाजूच्या नेहमीच्या पाहण्यातील व्यक्तींनी असे काहीतरी वेगळे करुन स्वतःची प्रगती कशी साध्य केली याची असंख्य उदाहरणे त्यांनी पाहिलेली असतील.आपणही असे काहीतरी व्यवसाय / उद्योग केला पाहिजे, असे मनातून वाटणारे अनेक जण असणार यात शंका नाही.   

या सगळ्या मनातील विचारांना आजमावून पाहण्यासाठी प्रथम आपण ह्या विषयावरील पुस्तकांना / मासिकांना जवळ केले पाहिजे.आज मराठी भाषेमध्ये ह्या विषयांवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकांतुन आपल्या मनातील विचारांना एका मार्गावर नेण्यास मदत होते. उद्योग / व्यवसाय हा छोट्यात छोटा असू शकतो, ज्यामधे पैशाची गरज ही कमीतकमी असू  शकेल. तसेच असाही उद्योग असेल की ज्यामधे पहाटे ३ / ३ || पासून  काम सुरु करुन रात्री १० पर्यंत करावे लागेल. काही उद्योगांमध्ये भरपूर प्रवास असेल तर काही उद्योगांमध्ये एका अत्यंत छोट्या जागेमध्ये दिवसभर थांबावे लागेल. एखाद्या उद्योगामध्ये पैशाची गरज खुप जास्त असेल आणि त्यात नफा सुरु होण्यासाठीचा लागणारा वेळही तुलनेने जास्त असेल. 

एखाद्या अनुभवी व्यक्तीला चांगला तांत्रिक अनुभव असेल परंतू त्या उत्पादनाविषयीच्या / सेवेविषयीची व्यावसायिक माहिती / अनुभव नसेल. पुस्तकांच्या / मासिकांच्या वाचनातून आपल्याला जाणीव होईल की, मला माझ्या विचारांना ( उद्योजक होण्याच्या ) पुढे नेण्यासाठी काय - काय तयारी करावी लागेल, माझ्या मानसिक / शारिरीक / आर्थिक क्षमतेनुसार मी कोणता व्यवसाय करणे जास्त चांगले असेल, अनेक यशस्वी मंडळींनी सुरुवात कशी केली होती, त्यांना सुरुवातीला कोणत्या अडचणी आलेल्या होत्या अन त्यावर त्यांनी कशी मात केली, त्यांना कोणी मार्गदर्शन केले अन आपल्यालाही असे मार्गदर्शन कसे मिळेल इत्यादी.

माझ्या इच्छुक उद्योजक मित्रांनो, मग करा सुरुवात आजपासूनच अन मिळवा माहिती मनातल्या उद्योजकीय तयारीसाठी.

धन्यवाद अन खुप खुप शुभेच्छा.

कार्यकारी संपादक - यशस्वी उद्योजक.

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.



Monday, March 9, 2020

यशस्वी उद्योजक ह्या मासिकाविषयी माहितीचा सदर ब्लॉग..


               यशस्वी उद्योजक ह्या मासिकातील अगदी पहिला लेख आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. पुढच्या अनेक ब्लॉग्स मध्ये ह्या मासिकातील विविध पैलू असलेली माहिती येथे प्रकाशित होईल, हे मात्र नक्की. वाचक म्हणून आपण ह्याचा आनंद अनुभवाल ह्यात विश्वास वाटतो.

               '  यशस्वी उद्योजक ' हे  मासिक ' दे आसरा फाउंडेशन ' ह्या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात येते. दे आसरा हि संस्था गेली ५ वर्षे उद्योजकता विकास , रोजगार निर्मिती अश्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ह्या संस्थेचे '  यशस्वी उद्योजक ' हे मासिक म्हणजेच व्यवसायास चालना देण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहे. ह्या मासिकातून दर महिन्याला विविध उद्योजकांच्या यशकथा, मार्केटिंग , ब्रॅण्डिंग , विविध सरकारी योजना, उद्योजकतेच्या विविध संधी असा माहितीचा भरपूर खजिना दरमहा घरपोच  वाचायला मिळणार आहे.
             सध्याच्या आधुनिक युगातयशस्वी उद्योजक ' मासिक फेसबुक, इंस्टाग्राम , गुगल बिझनेस,  युट्युब, अश्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहे. ह्या ब्लॉगच्या रुपातुन आपल्याला ह्या मसिकतील विविध यशकथा, व्यवसायासाठीच्या मार्गदर्शनपर माहिती वाचायला  मिळणार आहे.  
आपला भरघोस असा पाठिंबा आम्हाला आवश्यक आहे. आपल्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना तसेच आपण स्वतः ह्या मासिकाचे वर्गणीदार होऊन आम्हास पाठिंबा द्यावा ही विनंती.