नुकतेच CBSE चे ९वी चे पुस्तक वाचण्यात आले. त्यामधे दूसरा धड़ा आहे ' People As Resource ' या नावाचा. त्यामध्ये त्यांनी मनुष्यबळाच्या उत्पादकतेविषयी भाष्य केलेले आहे. मनुष्य हा शिक्षित व कौशल्य प्रशिक्षित असल्यास तसेच आरोग्यपूर्ण असल्यास उत्पादन होऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळ खुप जास्त असले तरी ते ' बोजा ' न बनता हुकमी पत्ता बनू शकते. पुढे त्या धड्यामधे सरकारने केलेल्या यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, कौशल्य शिक्षण, उद्योजकता व त्याविषयीच्या योजना यांच्याविषयी माहिती आहे. तसेच आरोग्यसेवा सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले त्याविषयी माहिती आहे.
खरे तर कोणत्याही गोष्टी करत असताना प्रत्येकाने आरोग्याकडे तेवढेच लक्ष देणे महत्वाचे आहे. विद्यार्थीदशेतही केवळ अभ्यास एके अभ्यास करुन चालत नाही. परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी तब्येत चांगली राखणे तितकेच महत्वाचे असते. कितीतरी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आजारपण येते अन मग त्या अत्यंत महत्वाच्या काळात मनासारखा अभ्यास केला जात नाही. आरोग्याकडे चांगले लक्ष दिल्यास परीक्षा आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने दिली जाते अन उत्कृष्ठ यश मिळू शकते.
त्याच्या उद्योगात / व्यवसायात त्याला पूर्णपणे लक्ष द्यावे लागते. शिवाय उद्योगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी धावपळ करावी लागते. उद्योग चालू असताना वेळोवेळी येणाऱ्या बदलांसाठी जागरूक राहून त्वरित निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक ताण तर नेहमीचीच गोष्ट, त्यासाठी मानसिक शांतता राखुन निर्णय घेणे, वेगवेगळ्या लोकांशी संवाद करणे गरजेचे. त्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य राखणे अत्यावश्यक ठरते. उद्योजकाने त्याचे ज्ञान, अनुभव आणि आर्थिक बळ सर्वच गोष्टी त्याच्या उद्योगात / व्यवसायासाठी गुंतवलेल्या असतात. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना वेळ दिलेला नसतो. या सर्व गोष्टींची गुंतवणूक त्याने केलेली असते. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून तो ही गुंतवणूक फलदायी कशी करणार ?
उद्योजकाचा बराचसा दिवस योजनाबद्ध नसतो. घडणाऱ्या गोष्टींनुसार त्याला आयत्या वेळेत बदल करावे लागतात.त्याचा प्रवास (जवळपासच्या भागात / वेगवेगळ्या शहरात), अवेळी खाणे-पिणे, उन्हा-तान्हात,धुळीत वावरणे, रात्री उशिरापर्यंत काम, अशा अत्यंत अनिश्चित पद्धतीने त्याची दिनचर्या असते. त्याला आरोग्यसल्ला देताना या गोष्टीचा विचार करणे फार महत्वाचे आहे. तसे नसल्यास असा सल्ला फारसा उपयोगी पडणार नाही.
उद्योजकतेवरील बऱ्याचशा पुस्तकांमध्ये उद्योग सुरु करण्यापासून ते तो चांगला यशस्वी करण्यावर भर दिलेला आढळतो. या परिस्थितीत आरोग्य कसे राखावे यावर मात्र यशस्वी उद्योजक ह्या मासिकाने भर दिला आहे. सुरुवातीला कै. डॉ. एच्. व्ही. सरदेसाई यांचे मार्गदर्शन तर त्यानंतर डॉ. प्राची साठे यांचे उपयुक्त असे लेख आहेत. मानसिक आरोग्यासाठी आतापर्यंत डॉ. अंजली पेंडसे, डॉ. संज्योत देशपांडे आणि आता डॉ. राजेंद्र बर्वे यांचे लेख आहेत.
उद्योजक यशस्वी होण्यासाठी त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे त्याने लक्ष पुरवावे ह्यासाठी ' यशस्वी उद्योजक ' ह्या मासिकाद्वारे केलेला प्रयत्न..!!
उद्योजक यशस्वी होण्यासाठी त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे त्याने लक्ष पुरवावे ह्यासाठी ' यशस्वी उद्योजक ' ह्या मासिकाद्वारे केलेला प्रयत्न..!!
आज ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन..!!
उद्योजकांना त्यांच्या उद्योगामध्ये ' आरोग्यपुर्ण ' यश मिळो ही शुभेच्छा.. !!
-----
लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
No comments:
Post a Comment